मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. तसेच यासाठी भाजपा तसेच इतरांकडून आंदोलनाचाही इशारा दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief-minister-uddhav-thackeray)यांनी मंदिरे उघडण्याबाबत महत्त्वाचे ( when-will-mandir-state-open-important-hints ) संकेत दिले आहेत.
मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. आता मंदिरेसुद्धा उघडली जातील. दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करणार आहोत. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. आपले आजी आजोबा, आई-वडील अशा वृद्ध व्यक्ती मंदिरात जातात. तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत आहे.
मंदिरात आरती करताना दाटीवाटी केली जाते. इतर प्रार्थनास्थळांवरही हीच परिस्थिती असते. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच मंदिरात प्रवेशासाठी गर्दी टाळणे आण मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत फटाके फोडू नका असे आवाहनही केले. ते म्हणाले की,दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढतो आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.