नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर केरळमध्ये तब्बल एका वर्षासाठी कोव्हिड-19च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांचा मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. केरळ सरकारच्या आदेशानुसार, लोकांना घरा बाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्याशिवाय सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागा, सर्व प्रकारच्या गाड्या आणि परिवहन सेवेमध्ये मास्क आवश्यक असेल. सर्व लोकांना आपापसांत सहा फूटांचे अंतर पाळावे लागणार आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. लग्न समारंभात 50 हून अधिक लोकांची उपस्थिती दंडात्मक कारवाईला पात्र करण्यात आली आहे. अशा कार्यक्रमात, स्वच्छतेबरोबर फेस मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना आयोजकांमार्फत सॅनिटायझर दिले जाणार आहे. अंत्यसंस्कारासाठीही असेच नियम बनविण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त लोक भाग घेऊ शकणार नाहीत. प्रत्येकाला फेस मास्क लावावा लागेल. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे अंत्यसंस्कार हे केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.