नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसची दहशत अजून कमी झालेली नसून जगभर पसरत चालली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील सहाशे यात्री इराक आणि इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असताना ते इराणची राजधानी तेहरान येथे अडकले आहेत. तर इराण आणि इराक येथेही इतर देशांनी सीमा कोरोनामुळे बंद केल्या असून भारतीय यात्री मागच्या आठ दिवसांपासून तिथे अडकले आहेत.
हे भारतीय यात्रेकरू इराकची राजधानी बगदादमध्ये प्रसिद्ध सुफी संत हजरत गौस पाक जिलानीं दर्गाह, मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले, तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेथील हॉटेल शिबा येथे मागच्या आठ दिवसांपासून ताटकळत आहेत. हे यात्रेकरू ३१ जानेवारी रोजी तेहरानमध्ये गेले होते. तेहरान जवळील कुम या शहरात हे यात्रेकरू अडकले आहेत. यात ६०० यात्रेकरूंमध्ये ४४ जण सोलापूरचे असून इराण आणि इराकमध्ये कोरोना पसरायच्या अगोदरच त्यांनी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. या यात्रेकरूंनी देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला तातडीने मायदेशी आणा असे आवाहनही या यात्रेकरुंनी सरकारला केले आहे. कोल्हापूरमधील साद टूर्स कंपनीने ही ट्रीप आयोजित केली होती.
इराणमध्ये अडकले भारतातले ३०० मच्छीमार
तसेच भारतातले ३०० मच्छीमार इराण मधील बंदर-इ-चीरु, चीरुयेह आणि होरोमोझगान प्रांतामध्ये अडकले असून गुजरात आणि अन्य राज्यातील हे मच्छीमार आहेत. त्यांनी फोनवरुन कुटुंबियांकडे मदत मागितली असून व्हिडीओही शेअर केले आहेत. हे मच्छीमार गुजरातच्या मारोली, भातखाडी, कलगाम, दांडी, नारगोल आणि वलसाडच्या आणि इतर गावातील आहेत. “गुजरातमधील हे मच्छीमार इराणच्या चीरुमध्ये अडकले आहेत. कोरोनाव्हायरसच्या भितीमुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत,” असे पाटकर यांनी सांगितले.