चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित समाजाच्या कल्याणासाठी अल्प तरतुद केली जाते. हा प्रकार अन्यायकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक चळवळ उभारली. आजच्या धर्मांध वातावरणात नागरिकांनी संविधानाच्या बाजुने उभे राहून विषमतावादी विचारांचा प्रतिकार करावा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचतर्फे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विनोद सोनटक्के, स्वागताध्यक्ष प्रशांत गजभिये तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. चेतन खुटेमाटे, सुधाकर अडबाले, कपिल सरदार, डॉ. विनोद माहुरकर, नितीन डोंगरे दिलीप वावरे उपस्थित होते.
भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असेही प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.
अध्यक्ष म्हणून विनोद सोनटक्के म्हणाले, संविधान हेच खरे स्वातंत्र्य होय. मंचाच्या वतीने नागरिकांच्या घरी भारतीय संविधान हा राष्टीय ग्रंथ पोहोविण्याचा संकल्प करण्यात आला होता. संविधान दिन साजरा करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ९८६ नागरिकांच्या घरी १ हजार ९८६ संविधान ग्रंथ पोहोचविण्याचा संकल्प केला. डॉ. खुटेमाटे म्हणाले, संविधानात स्वातंत्र्य, समता, न्यायाचा विचार आहे. भारताचा नागरिक गरीब असताना देशात श्रीमंताची वाढ झपाट्याने झाली. युवकांना शिक्षण, रोजगाराची गरज असताना बजेटमध्ये कमी रक्कम तरतूद केल्या जाते. संचालन रितीक खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.