जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ जिल्हा व महानगर काँग्रेसतर्फे काँग्रेस भवन येथे तोंडावर काळ्या पट्ट्या लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेश कोतवाल, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, एन.एस.यू.आय. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राजेंद्र पाटील, जमील शेख, श्रीधर चौधरी, श्याम तायडे, मनोज सोनवणे, बाबा देशमुख, अमजद पठाण, मनोज चौधरी, डॉ. शोहेब पटेल, योगिता शुक्ला, सखाराम मोरे, पी.बी. पाटील, जाकीर बागवान, प्रल्हाद सोनवणे, श्रीधर चौधरी, दीपक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदू महासभेच्या कृत्याचा गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे निषेध
जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जगभर विविध कार्यक्रम होत असताना अलीगढ येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला गोळ्या घालून कृत्रिमपणे रक्तस्त्रावाचा आभास आणून हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा अवमान केला आहे. हिंदू महासभेच्या या कृत्याचा गांधी रिसर्च फाउंडेशनने निवेदनाद्वारे निषेध केला आहे. तसेच राष्ट्रीय ऐक्य अबाधित राखण्याचे आवाहन फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
या घटनेतून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेविषयी हिंदू महासभेचे वरिष्ठ नेते मौन बाळगुन आहेत, त्यांच्या मौनाचे कारण काय? अशा मौनाला घटनेत सहभागी असलेले मंजुरी समजतात आणि अशा घटना वारंवार करण्यातच शौर्य असल्याची त्याची भावना होते. प्रसार माध्यमांनी अशा घटना वारंवार दाखवून अशा घटनेला योग्य ठरविण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही फाउंडेशनने उपस्थित करत गांधी रिसर्च फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्य, अहिंसा, बंधुत्व, प्रेम आणि करूणा या सिद्धांतावर आपल्या राष्ट्राची उभारणी झाली आहे. या सगळ्या गुणांमधूनच नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होत असते. या सिद्धांतांना मूर्तरूप देणारे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी. त्यांची अशा प्रकारे अवमान करणे म्हणजे घृणास्पदच आहे. अशा घटनांमधून युवकांना राष्ट्रविरोधी कार्यात प्रोत्साहन देणाऱ्या या घटनेतील कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करत देशात सद्भावनेची, राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करूया, शांतता राखूया असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
यासह केंद्र सरकार, राज्य सरकार आणि माध्यमातील अभ्यासकांनी महात्मा गांधीजींच्या हत्येमागील तथ्य नेमके काय आहेत, हे जाणून घ्यावे. गांधीजींच्या हत्येमागील सत्यतेशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून गांधीजींच्या हत्येमागील सत्यता लोकांसमोर अधिक प्रभावीपणे आणण्यासाठी हे दस्तावेज खुले आहेत. गांधीजींचे विचार योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समृद्ध ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे असे निवेदनाच्या माध्यमातून गांधी रिसर्च फाउंडेशनचे डीन डॉ. जॉन चेल्लादूराई यांनी म्हटले आहे.