नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – जाता जात नाही ती जात, जात हि माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी निगडित नसून ,सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा निगडित आहे. जीवन जगात असताना या देशातील प्रत्येक प्रश्नांचा संदर्भ ,आणि संबंध हा जातीशी आहे. देशात जातव्यवस्था मानणारी व्यक्ती परदेशात जाताना तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन जाते .त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तोआंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजनिर्मितीचे प्रथम मुखपत्र मूकनायक’ शताब्दी समारोह अंतर्गत मुक्तिवाहिनी आणि रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त अभियान डॉ.आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे गुरुवारी डॉ. धनराज डाहाट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ‘जाती अंताचे वर्तमान संदर्भ’ या विषयावर डॉ. डाहाट बोलत होते .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिला आहे ,जातीअंताचा नारा दिला त्या विचारांशिवाय जाती विषयावर खरे संशोधन होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेबांनी जाती संदर्भात मूलभूत विचार मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की, ‘जातीच्या पायावर तुह्मी कशाचीही पायाभरणी करू शकत नाही. ना राष्ट्राची ,ना नैतिकतेची जर उभारणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तडे जातील. जातीच्या प्रश्नातून काहीही साध्य होणार नाही तसेच जातीच्या प्रश्नाला बाबासाहेब हे बुद्ध तत्त्वज्ञानातून पाहतात. त्यामुळेच त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. धर्मांतराबाबत बाबासाहेब म्हणतात की, जीवनाच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल, मूल्यांमध्ये बदल, विचारसरणी व दृष्टिकोनात संपूर्ण बदल म्हणजे धर्मांतरण होय.धर्मांतर हा शब्द योग्य वाटत नसेल तर नवजीवन असेही त्याला म्हणता येईल. असें बावीस प्रतिज्ञांपैकी २१ व्या प्रतिज्ञेत स्पष्टपणे ऊल्लेख आहे. असेही डॉ. डाहाट यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.नरेंद्र शेलार. का.रा. वालदेकर ,नरेश वाहाणे, एन.एल. नाईक, दादाकांत धनविजय, राहुल दहीकर, दिलीप सूर्यवंशी, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. विनोद डोंगरे, संजय गोडघाटे, सेवक लव्हात्रे, श्रीराम बन्सोड, धर्मराज निमसरकर, शिवचरण थूल, नलिनी डहाट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.