पुणे बहुजननामा ऑनलाईन – शिक्षण आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देते परंतु आदिवासींकडे शिक्षण नसल्यामुळे वाईट परंपरा, अंधश्रध्दा त्यांच्यामध्ये रुजल्या होत्या त्या दूर करत आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची संस्कृतीही टिकून राहिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. माडिया शिकू’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन ‘ घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखन मंजिरी परांजपे, ऋजुता टिळेकर, मैथिली देखणे-जोशी, ख्रिस्तीन फरायस यांनी केले आहे. आदिवासींच्या शिक्षणासाठी बाबांनी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला मुले शाळेतून पळून जायची. दोन वर्षांनी हे प्रमाण कमी झाले. शाळेत अनेक स्वयंसेवक आपणहून रुजू झाले. ते गावोगावी फिरले, त्यांनी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शहरी संस्कृतीचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ नये, अशी इच्छा होती. ४५ वर्षांत वाईट प्रथा कमी होत गेल्या आणि हे सगळे करत असताना संस्कृती मात्र टिकून राहिली असे डॉ. प्रकाश यांनी सांगितले.
किरण कुलकर्णी म्हणाले, मुख्य प्रवाहात आज गोंधळलेली अवस्था आहे. या अवस्थेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आदिवासी प्रवाहात नक्की सापडतात. आदिवासी प्रवाह मुख्य प्रवाहात नेण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरूआहे. शासकीय चौकटीच्या मयार्दा पाळून हे प्रवाह एकत्रित करण्याचे आव्हान पेलायचे होते. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करताना त्यांना मुख्य प्रवाहातील संधी मिळवून देणेही महत्वाचे आहे. संशोधनातून येणारी प्रगल्भता, अभ्यासातून येणारे भान आणि वर्तमानाची जाणीव यांचा समुच्चय संस्थेमध्ये आहेत.