मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आता बर्यापैकी स्थिर झाले असून या सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. निवडणुकीत दिलेली अश्वासने पाळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन योजना अस्तित्वात आणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली आहे. आपआपल्या पक्षांना अनुकुल असे निर्णय घेण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीने धडाका लावला असताना राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र नको त्या विषयांवर वादविवाद घालण्यात धन्यता मानत आहेत, नेमकी हीच बाब काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली असून काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी राज्यात एक समिती गठीत करावी, अशी मागणी देवरा यांनी पत्राद्वारे पक्षाकडे केली आहे.
मिलिंद देवरा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये पक्षाने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. या निर्णयामुळे लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल. निवडणुकीतील आश्वासनाबाबत भारतीय नागरिक सुज्ञ झाला आहे. अनेकांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. मात्र गेल्या 50 दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांचे अजेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राज्यातील जनता सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहे. मार्च 2019 मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईत केलेल्या भाषणात गरिबांना पाचशे स्क्वेअर फूट घर देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारच्या किमान समान कार्यक्रमात याचा समावेश आहे. मुंबईतील मतदार नेहमी काँग्रेसवर विश्वास ठेऊन असतो. 1984 पासून काँग्रेसने मुंबईकरांना परवडणारी घरे देण्याचे काम केले आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईकरांना अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही समिती गठीत करावी, असे देवरा यांनी सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याऐवजी जाहीर वक्तव्ये करून नको ते वाद उकरून काढत असल्याने राज्यातील महाविकास आघाडीत वाद-विवाद होत आहेत. हिच बाब देवरा यांनी हायकमांडच्या निर्दशानस आणून दिल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, 2014 च्या निवडणुकीनंतरही शिवसेना-राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होतो, पण काँग्रेसने तो नाकारला होता. चव्हाणांच्या या वक्तव्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी असेच वक्तव्य केले आहे. सरकार संविधानाच्या चौकटीत काम करेल असे सोनिया गांधी यांनी लिहून घेतले असून शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी हे मान्य केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर आम्ही काहीही लिहून दिले नाही, असा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अशा प्रकारचे वाद काँग्रेस नेते विनाकारण ओढावून घेत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Visit : bahujannama.com