नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रीपेड ग्राहकांना स्वस्त वीज मिळू शकते. उर्जा मंत्रालयाने राज्यांना म्हटले आहे की, राज्यांनी आपआपल्या वीज नियामकांना प्रीपेड वीज ग्राहकांसाठी दर कमी करण्यास सांगावे. मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रीपेड मीटरमधून वीज वितरण करणार्या कंपन्यांना मीटर रिडींग, बिल आणि कलेक्शन सारखा जास्तीचा खर्च आता करावा लागणार नाही.
असा असेल प्रीपेड मीटर
प्रीपेड मीटर सर्वसाधारण मीटरपेक्षा वेगळा आहे. यासाठी ग्राहकाला वीज बिल भरण्याऐवजी मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावे लागेल. ग्राहक जेवढा रिचार्ज करेल तेवढाच वीजेचा वापर करू शकतो. रक्कम संपल्यानंतर घरातील वीज गायब होईल. परंतु, यापूर्वी संबंधित ग्राहकाला मोबाईलवर अलर्ट मेसेज येईल. मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांला मीटरशी संबंधित सर्व माहिती दिली जाईल.
3 वर्षात सर्व मीटर होणार स्मार्ट प्रीपेड मीटर
1 एप्रिल 2019 पासून 3 वर्षात सर्व मीटर स्मार्ट प्रीपेड मीटर करण्याची सरकारची योजना आहे. उर्जा मंत्रालयाने म्हटले, राज्य आपल्या विद्युत नियामक आयोगाला (एसईआरसी) त्या ग्राहकांसाठी वीजेच्या दरात कपात करण्यास सांगू शकते जे प्रीपेड मीटरद्वारे वीज घेत आहेत.
6 महिन्याच्या आत दिलासा
आदेशात म्हटले आहे की, अगोदर पैसे भरून जर कुणी ग्राहक वीज घेत असेल तर त्यांच्यासाठी वीजेच्या दरात कपात करण्यासाठी संबंधित नियमन किंवा आदेश किंवा व्यवस्थेमध्ये बदल, हे पत्र (16 जानेवारी 2020) जारी होण्याच्या 6 महिन्याच्या आत झाले पाहिजेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रीपेड मीटरमुळे वीज वितरण कंपन्यांना मीटर रिडींग, बिल आणि पैसे जमा करणे यासारखे खर्च आता करावे लागणार नाहीत. यासाठी वीजेच्या दरात कपात केली पाहिजे.
Visit : bahujannama.com