नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की, अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येत्या काही दिवसात कोरोनाचे संकट आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी देशाला तयार राहावे लागणार आहे. सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी यापूर्वी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. लस घेण्यासाठी सर्वसामान्य माणूस रांगा लावणार, संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. यात शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार असे राहूल गांधी यांनी म्हटले होते. तसेच केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आली आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्याचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.