नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीचे रूपांतर महाभारतात झाले आहे. सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली आणि त्या पत्रालाही उत्तर दिले ज्यामध्ये नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. यानंतर कॉंग्रेस समिती दोन भागात विभागली गेली. एकीकडे लोक गांधी कुटुंबाच्या समर्थनात दिसले, तर दुसरीकडे बंडखोर नेत्यांनीही उघडपणे त्यांना आव्हान दिले आहे. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ कॉंग्रेसचे नेते ए. के. अँटनी यांनी पत्र लिहिण्याच्या या निर्णयावर टीका आणि नेतृत्व बदलण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांविषयी संतापही व्यक्त केला. यानंतर राहुल गांधी यांनी पत्राच्या वेळेवर अत्यंत तीव्र स्वरात प्रश्न उपस्थित करत म्हटले की, पत्र भाजपच्या संगनमताने लिहिले गेले आहे. राहुलनंतर प्रियंका गांधींनीही गुलाम नबी यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी कठोर वृत्तीने म्हणाले की, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल होतानाच पक्ष नेतृत्वावर पत्र का पाठवले गेले होते? ते बैठकीत म्हणाले की, ‘राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार संकटात सापडले असताना सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्वाबद्दल पत्र लिहिले गेले होते. पत्रात काय लिहिले होते, यावर चर्चा करण्यासाठी योग्य जागा म्हणजे सीडब्ल्यूसी मीटिंग, मीडिया नाही.’ हे पत्र भाजपच्या संगनमताने लिहिले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या या वृत्तीबद्दल प्रियंका गांधी नाराज आहेत.
गांधी कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांबाबत सीडब्ल्यूसीच्या बैठकीत गुलाम नबी आझाद म्हणाले की, जर संगनमत सिद्ध झाले तर ते राजीनामा देतील. मात्र, उत्तर देताना त्यांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले नाही. त्याचवेळी कपिल सिब्बल यांनीही ट्विट करून राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कपिल सिब्बल म्हणाले की, भाजपला मदत केल्याचा आरोप लावला गेला आहे. ते म्हणाले, ‘राजस्थान उच्च न्यायालयात मी कॉंग्रेस पक्षाचा बचाव केला. मणिपूरमध्ये पक्षाचा बचाव केला. गेल्या ३० वर्षात कधीही कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने विधान केले नाही. तरीही आम्ही भाजपसह आहोत!’
कपिल सिब्बल यांच्या ट्विटला कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, राहुल गांधींनी असे (भाजपशी संबंध) काहीही म्हटले नाही. अशा चुकीच्या माहितीमुळे संभ्रमित होऊ नका. एकमेकांशी किंवा कॉंग्रेस पक्षाशी लढा देण्याऐवजी आपण निरंकुश मोदी सरकारबरोबर एकत्रितपणे लढायला पाहिजे. दुसरीकडे कॉंग्रेस आयटी सेलच्या माजी प्रमुख दिव्या स्पंदना यांनी पत्र लिहिणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, ‘त्यांनी केवळ माध्यमांमध्ये पत्रच लीक केले नाही, तर सीडब्ल्यूसीच्याही सर्व गोष्टी लीक करत आहेत. आश्चर्यकारक आहे!’
७ ऑगस्ट रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. हे पत्र कॉंग्रेसच्या २३ नेत्यांच्या स्वाक्षरीसह लिहिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सूत्रांनी असेही म्हटले आहे की, केवळ २३ च नव्हे तर देशभरातील एकूण ३०३ कॉंग्रेस नेत्यांनी डिजिटल माध्यमातून या पत्राला सहमती दर्शवली आहे. सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, शशी थरूर, जितिन प्रसाद, मुकुल वासनिक, भूपेंद्र सिंह हुड्डा, मिलिंद देवरा, रेणुका चौधरी, अखिलेश प्रसाद, पीजे कुरियन, संदीप दीक्षित, टीके सिंह, कुलदीप शर्मा, विवेक तंखा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, अरविंदर सिंह लवली असे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना पक्ष नेतृत्वात बदल हवा आहे.
त्याचवेळी कॉंग्रेसचे तीन विद्यमान मुख्यमंत्री गांधी कुटुंबासह उभे असल्याचे दिसत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गांधी कुटुंबावर जाहीरपणे विश्वास व्यक्त केला आहे. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीतही हे तीन मुख्यमंत्री गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ उभे असल्याचे दिसून आले.