मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बाकीच्या कामात पिछाडी असली तरी जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेसने आघाडी मारली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज जागावाटपावर शिक्कामोर्तब केलं.
लोकसभा निवडणुकीतनंतर पक्षांतरामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. आडमुठेपणाची भूमिका न घेता दोन्ही पक्षांनी निम्म्या-निम्म्या जागा लढण्याच ठरवलं आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही या गोष्टीचे समर्थन केले असून पाच ते सात जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे, त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही मलिक यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. अणुशक्ती नगर, कुर्ला, वरळी, दिंडोशी, मागाठणे, विक्रोळी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.