मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाबद्दल आता कोणताही वाद नसल्याचे सांगितले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये खातेवाटपा संबंधित चर्चा होणार असून त्यात काहीतरी मार्ग निघेल, असे थोरात यांनी सांगितले. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासोबत बोलणे झाले असून त्यांचा सन्मान करण्यात येईल. काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून त्या पद्धतीने थोपटे यांचा विचार केला जाईल. तसेच तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्रिपद वाट्याला आले नाही, असेही थोरात यांनी सांगितले
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली होती. पण थोपटे यांनी आपल्याला तोडफोडीबद्दल काहीही कल्पना नसल्याचे सांगून घडलेल्या घटनेचा निषेध केला. यानंतर थोरात यांनी आमदार थोपटेंशी फोनवर चर्चा केली. त्यांच्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले की, संग्राम थोपटे हा चांगला व उत्तम कार्यकर्ता असून त्यांच्या मागील पिढ्या या काँग्रेसशी एकनिष्ठ होत्या. तसेच त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते. परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे त्यांना वाट्याला आलेल्या जागांमध्ये कसरत करावी लागत आहे. थोपटे यांना मंत्रिपद दिले नसले तरी त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल.
Visit : bahujannama.com