मुंबई: बहुजननामा ऑनलाइन – रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या (republic-editor-arnab-goswami) अटकेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष आमने-सामने आले आहेत. गोस्वामी यांच्या सुटकेसाठी भाजप आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी अर्णब यांच्यावर टीका सुरू केली आहे. अर्णबने ज्या पद्धतीने इतरांना वागवले, त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी एकही व्यक्ती नाही. अती तिथे माती होणारच, अशा शब्दांमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (congress-leader-ashok-chavan) यांनी गोस्वामीवर टीका केली.
एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अशोक चव्हाण उपस्थित होते. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी बोलताना चव्हाण यांनी अर्णब गोस्वामीवर टीकास्त्र सोडले. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामीना गेल्या आठवड्यात अटक झाली. गोस्वामीसह तिघांनी आपले पैसे थकवल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून नाईक यांनी 2018 मध्ये आत्महत्या केली. मात्र, या प्रकरणाची फाईल फडणवीस सरकारने बंद केली. यावरही चव्हाण यांनी भाष्य केले आहे. आधीच्या सरकारनं गोस्वामीना पाठीशी घातले का, हा चौकशीचा भाग आहे, असे चव्हाण म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीक केली. राज्य सरकारनं शहाणं व्हावे. जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही. पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे, तर नीट काम करावे. कुणी काही बोलतंय त्यावर रिअॅक्ट करून त्रास देणे बंद करावे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.