औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – संबंध महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे ग्रामीण व शहरी भागातील जनता दुष्काळामुळे होरपळली आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत असून राज्य शासनाने दुष्काळातून लोकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात, या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दुष्काळामुळे राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे लोकांना जलकुंभावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचेही प्रशासन ऐकत नसल्याची स्थिती आहे. औरंगाबादमधील नहर-ए-अंबरीचे संवर्धन केल्यास, जुन्या शहराचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. मात्र, नहर-ए-अंबरीची नासधूस करण्यात येत आहे. आजच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. दुष्काळग्रस्तांना रेशन नाही अशी स्थिती असून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली आहे.
निदर्शनावेळी राम बाहेती, अश्फाक सलामी, अभय टाकसाळ, कैलास कांबळे, अशोक जाधव, मधुकर खिल्लारे, प्रकाश बनसोड, एन. आर. सूर्यवंशी, शेख खुर्रम, रूपचंद ढवळापुरे, मधुकर दुधवडे, सुरेश ठोंबरे, रामेश्वर लाड यांच्यासह शेतकरी, मजुर आदी उपस्थित होते.