बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane) यांनी कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे, असा गंभीर आरोप निलेश(Nilesh Rane) यांनी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला आहे.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर नाणार प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. मात्र आता नाणार प्रकल्प पुन्हा एकदा कोकणातच सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. यावरुनच निलेश राणे यांनी ट्विट करत नाणार प्रकल्प १०० टक्के कोकणातच पुन्हा एकदा आणला जाणार असल्याचा दावा केला आहे.
तसेच निलेश राणे यांनी ट्विट करत म्हणाले की, १०० टक्के नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात आहे तिथेच राहणार. खासदार विन्या राऊतला कोण विचारतं?? मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने बाधित जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे व खरेदी केलेली आहे म्हणून काही करून मुख्यमंत्री आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार…पडद्याआड सगळं ठरलं आहे”, असे त्यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांच्या ट्विटने आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. कारण थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यानं हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे.