बहुजननामा ऑनलाइन टीम – अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेल्या एका तरुणाने राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या(body of a young man) केली आहे. नागेश्वरवाडी, औरंगाबाद परिसरात गुरुवारी (दि. 21) सकाळी ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादानंतर आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
सागर पोपटराव पोळ (वय -22, रा. पोळशंकरपूर, गंगापूर, ह. मु नागेश्वरवाडी, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद शहरात आला होता. नागेश्वरवाडी भागात सागर हा एका खोलीत राहत होता. काही दिवसांपासून पोळ कुटुंबात वाद सुरू होते. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कुटुंबीयांनी त्याची समजूत देखील काढली होती. परंतु, गुरुवारी सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक फौजदार डी. जे. शिंदे तपास करीत आहेत.