बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसकडून(CMO’s office ) या नामांतराला विरोध होत आहे. असे असताना राज्य मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर केला आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी 3 ट्विट करत काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला ठाम विरोध असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.
मुंबईत बुधवारी (दि. 6) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असे थोरात यांनी सांगितले. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो याचे भान बाळगावे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे आवाहन देखील थोरात यांनी केले आहे.
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यासाठी 24 कोटी 64 लाख 24 हजार 788 इतका खर्च येणार आहे. या संदर्भातील ट्वीट CMO च्या हँडलवर केली असून त्यात संभाजीनगर असा उल्लेख केला आहे.