बहुजननामा ऑनलाइन टीम – कोंढव्यात गेल्या चार वर्षात वेगाने बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला असून असंख्य तक्रारी असतानाच महापालिका केवळ काही सिलेक्टीव्ह ठिकाणी कारवाईचा देखावा करत आहे. ( illegal constructions)अतिक्रमण विभागाकडे पोलिसांचे अख्ख पथक दिले असतानाही पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देऊन कारवाईला टाळाटाळ करताना दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीनंतर कोंढव्यात अनधिकृत बांधकामांना वेग आला.शिवनेरीनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, नावाजीश पार्क, गल्ली नंबर १ ते ३१, कोंढवा सर्व्हे नं. ४६, ४२, जे. के.पार्क, मलिकनगर, ५ नंबर, सर्व्हे नं . १५ , साई सर्व्हिसच्या मागील इमामनगर अशा अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे राजरोजपणे उभी रहात आहेत. त्यामुळे ज्या सोसायट्या यापूर्वी महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे रस्ते, पाणी, वीज असे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होऊ लागले आहेत. मात्र, या सर्व बेकादेशीर बांधकामांकडे महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
यादरम्यान सर्व्हे नं. ४६ येथील बेकायदा बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकाम व्यावसायिक समर सैय्यद, असीम शेख, दानिश कुडिया यांचे ७ गुंठे जागेवर अनधिकृतपणे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तेथील सोसायट्यांचा रस्ता, बंद होत असून हवा जाण्यासाठीही जागा उरली नसल्याचे दिसून येते. या सोसायटीच्या सभासदांनी नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सोसायटीचे सभासद व नुराणी कब्रस्तान ट्रस्ट व कार्यकर्त्यांना घेऊन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन सर्व्हे नं. ४६ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत पत्र देऊन कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी दोन दिवसात कारवाई होईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
याबाबत बांधकाम विभागचे अभियंता कैलास कराळे यांनी सांगितले की, कारवाई करणे इतके सोपे नाही. स्थानिक पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त लागतो. कारवाई कधी होईल, हे सांगता येत नाही, असे त्यांचे यावर उत्तर होते.नामदेव गंभीरे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की ,अनधिकृत बांधकामे बाबत माझ्याकडे माहिती नाही.
नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख यांनी अनधिकृत बांधकामे थांबविणे हे आमचे काम नाही. कोंढव्यातील ८० टक्के अनधिकृत बांधकामे ही बाहेरील बिल्डरनी येऊन केली आहेत. महापालिकेला आम्ही त्याविरुद्ध नेहमी पत्रे देतो, पण मनपा कारवाई करत नाही.
नगरसेविका हमीदा अनिस सुंडके यांनीही आम्ही महापालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे पत्र देतो, पण मनपा कारवाई करत नसल्याचे सांगितले. महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या संगनमतांशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे होऊच शकत नाही, असे कोंढव्यावासीयांचे म्हणणे आहे. नगरसेवक अशा अनधिकृत बांधकामांविरुद्ध केवळ पत्रे देऊन आपण
विरोधात आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेचे अधिकारीही नगरसेवकांनी सांगितलेल्या ठिकाणीच केवळ दाखविण्यापुरते भिंतीला चार होल मारुन कारवाई केल्यासारखे दाखवितात. प्रत्यक्षात त्यानंतर हे बांधकाम पुन्हा सुरु आहे का याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. महापालिकेच्या अधिकार्यांची पाठ वळताच ही भिंतींना पाडलेली भोके दुसर्या दिवशी पुन्हा बुझविली जातात आणि पुन्हा वेगाने बांधकाम सुरुच राहते. बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे करुन कारवाई करण्यास टाळाटाळ करता दिसून येते.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी पोलीस निरीक्षकांसह मोठा फौजफाटा कायमस्वरुपी दिलेला असतो. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी त्यांनी हे मनुष्यबळ वापरणे अपेक्षित असते. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर, त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त वेळोवेळी पुरविला जातो. महापालिकेने कारवाईसाठी दिलेल्या पोलीस दलाचा अगोदर वापर केला पाहिजे, त्यानंतरच गरज असेल तर अधिकचा बंदोबस्त मागवावा.
या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रकारामुळे अनधिकृत बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे कोंढवा परिसरातील सर्व नागरी सुविधांवर त्यांचा ताण येऊ लागला आहे. त्यातूनच कोंढवा दिवसेंदिवस बकाल होऊ लागले आहे. पण त्याकडे सर्व जण सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.