बहुजननामा ऑनलाईन टीम – गुरुवारपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा काढत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, बांधकाम मजुरांचे मृत्यू, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान, धनगर आरक्षण अशा अकरा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. नाही तर आम्हीही त्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा बुधवारी पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण केल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस हे करत असून स्वतः ची पाठ थोपटून घेतात. महाजनादेश यात्रा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढला जात आहे. पुणे शहरामध्ये बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. दहा हजार कोटींची निधी बांधकाम कामगार मंडळाकडे जमा झाला आहे. त्यातील किती पैसे हे बांधकाम मजुरांवर खर्च करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस बिलाची थकबाकी आहे. यावर आपण शेतकऱ्यांनो धीर धरा असे सांगणार आहात का ?असा प्रश्नही शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.
लिंगायत समाजाला ओबीसीच्या सवलती कशा देणार, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे सर्व लाभ कसे देणार, मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना १२२१ कोटी रुपयांचा नफा कसा मिळविला, हे आपण शेतकऱ्यांना कसे सांगणार आहात. तसेच सरकारने पीक विमा योजना नव्हे तर, प्रधानमंत्री कॉरपोरेट कल्याण योजना सुरु केली असल्याचीही टीका शेट्टी यांनी केली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर नाही दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रा मार्गावरून स्वाभिमानी संघटना जनतेची आक्रोश यात्रा काढेल, असे शेट्टी यांनी सांगितले.