मुंबई : बहुजनामा ऑनलाइन – शिवसेनेचे युवा सेना प्रमुख यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश काढणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही यात्रा काढण्यात येते आहे. या यात्रेतून ते संपुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढणार आहेत.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखील यश मिळावे यासाठी भाजपाकडून नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाजनयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १ ऑगस्ट सुरु होणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. मुख्यंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेतून मतदारांशी आदित्य थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री म्हणून आदित्य असतील याची जाहिरात करण्यात येते आहे. या पार्श्वभुमीवर भाजपसुद्धा महाजनादेश यात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधणार आहे.
दरम्यान शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ काम करा अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रभारी सरोज पांडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.