नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात तीन पक्षाच सरकार आहे. त्यामुळे कोणीतरी नाराज होणारच. पण सरकार मजबूत असून सरकारला धोका नसल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या मुद्यावर हा निर्वाळा दिला.
तीन पक्षांच सरकार असल्यावर कोणीतरी नाराज होणारच. ते स्वाभाविक आहे. मात्र, सरकारला त्याचा काही धोका नाही. सरकार मजबूत आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या 11 आमदरांसोबत चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं भूजबळ यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती.
यावेळी भुजबळ यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्या बाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलं हे बरं झालं. नाहीतर मुंबई पोलीस चांगलं काम करत नाहीत. कुणाला तरी वाचवत आहेत, असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. सरकार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप गोरंट्याल करत आम्ही नाराज असल्याचे म्हटले होते.नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत असल्याचे म्हणत माझ्यासह 11 आमदार नाराज असल्याचे म्हटले होते.