बहुजननामा ऑनलाइन टीम – ज्या रूग्णांना कोरोना होऊन गेला आहे अशा रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचे प्रकारे किंवा विविध रक्त रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रकार प्रकार दिसून आले आहेत. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या काही वाहिन्यांमध्ये गुठळ्या दिसून आल्या आहे. यामुळं यातील काहींचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉ ओक यांनी काय काळजी घ्यायला हवी हेही सांगितलं आहे. काय करून नये याचाही खुलासा त्यांनी केला आहे.
‘शासनानं पोस्ट सिंड्रोम ओपीडी तयार करावी’
डॉ ओक यांनी सांगितलं की, “यासाठी अॅलोपॅथी, फिजिओथेरपी, श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक आहेत. आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो आहोत. परंतु त्यामुळं नंतर होणाऱ्या परिणामांकड दुर्लक्ष झालं आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला होता त्यांची काळजी नंतरचे 40 दिवस ते 4 महिने घेणं आवश्यक आहे असं आता विविध निष्कर्षातून समोर आलं आहे. यासाठी शासनानं पोस्ट सिंड्रोम ओपीडी तयार करावी. यात तज्ज्ञ डॉक्टर असावेत. त्यात रक्ताच्या चाचण्या व्हाव्यात, सिटीस्कॅनसोबतच पल्मनरी फंक्शन टेस्ट केली जावी. अशा सूचना टास्क फोर्सनं सरकारला केल्या आहेत” असंही ते म्हणाले.
‘हृदयविकाराचा धोका’
पुढे बोलताना डॉ ओक यांनी असंही सांगितलं की, “अनेक कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले परंतु 10 दिवसांनंतर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. याचं कारण म्हणजे रक्ताच्या गुठल्या तयार होणं हे आहे. शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्येही या गुठळ्या होत असल्याचं दिसून आलं आहे. परिणामी पायाच्या पोटऱ्या दुखणं, विलक्षण थकवा येणं अशा समस्या येत आहेत. यापेक्षाही भयंकर म्हणजे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अशा गुठळ्या झाल्यानं पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढल्याचं दिसत आहे.”
श्वसनाचे व्यायाम करा
डॉ ओक म्हणाले, “अॅलोपॅथीत रक्त पातळ होण्यासाठीचं औषध रुग्णाला दिलं जातं. सुरुवातीच्या काळात अशी औषधं दिलेली नव्हती. मी स्वत: आजारी पडलो त्यानंतर म्हणजे मे-जून नंतर 10 दिवसांच्या औषधांचा कोर्स दिला जात आहे. ज्यांना रक्त आणि हृदयाचे त्रास आहेत अशांना सरसकट रक्त पातळ होणारी औषधं दिली जात आहेत. मात्र याला मर्यादा आहेत. अशा रुग्णांना अशी औषधं जास्त फार काळ देता येत नाहीत. कारण त्यांच्या यकृतावर याचा परिणाम होतो. अशा स्थितीत अॅलोपॅथीला मर्यादा येत आहेत. आता फिजिओथेरपीला पर्याय नाही. दुर्दैवानं आपण याकडे लक्ष दिलेलं नाही. अशा रुग्णांची फुप्फुसं नीट होण्यासाठी 8 ते 12 आठवडे लागतात. यासाठी रोज 45 मिनिटं श्वसनाचे व्यायाम करा. याची खूप आवश्यकता आहे” असं त्यांनी सांगितलं
‘स्वत: डॉक्टर बनू नका’
डॉ ओक म्हणतात, “आयुर्वेदात असंख्य वनस्पती आहेत ज्यांचा श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. लेंडपिंपळी वनस्तीचा दुधातून काढा मी स्वत: घेत आहे. दालचिनी लवंग पाण्यात भिजवून त्याचे सेवन करत आहे. यामुळं प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. परंतु अशा औषधांची, त्याच्या खरेपणाची तपासणी करूनच ती घ्यावी, यासाठी औयुर्वेदीक डॉक्टरांना विचारा. त्यांच्या सल्ल्यानंच काढा, औषध घ्या. स्वत: परस्पर डॉक्टर बनू नका. आयुर्वेदीक काढे मनाने घेऊ नका.” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.