लखनऊ : वृत्तसंस्था – ‘दलितांची मते विभागण्यासाठी सत्ताधारी भाजपने ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना बळ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे करण्याचा कट केला आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याचे चंद्रशेखर यांनी या महिन्याच्या प्रारंभी जाहीर केले होते. याबाबत मायावतींनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, दलितांच्या मतांची विभागणी व्हावी या दुष्ट हेतूनेच भाजपाने चंद्रशेखर यांना पुढे केले आहे. भाजपाने रचलेल्या कटकारस्थानाचा भाग म्हणूनच भीम आर्मीची स्थापना झाली होती. दलितविरोधी भाजपने आता घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.
मायावती म्हणाल्या की, चंद्रशेखर यांनी बसपामध्ये प्रवेश करावा असेही भाजपाकडून झालेले प्रयत्न आम्ही हाणून पाडले. दलित, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या विरोधात असलेल्या व सरंजामशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेतून खाली खेचणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसा विचार करून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दलिताने मतदान केले पाहिजे. त्यांचे एकही मत फुकट जाता कामा नये. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या गोष्टीचा मतदारांना भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल.
दलितों का वोट बांटकर बीजेपी को फायदा पहुंचाने के लिए ही बीजेपी भीम आर्मी के चन्द्रशेखर को वाराणसी लोकसभा सीट से चुनाव लड़वा रही है। यह संगठन बीजेपी ने ही षडयंत्र के तहत बनवाया है और इसकी आड़ में भी अपनी दलित-विरोधी मानसिकता वाली घिनौनी राजनीति कर रही है।
— Mayawati (@Mayawati) March 31, 2019