नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याबाबत विलंब होत असल्याने केंद्र सरकारने दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना फाशी देण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. अशा गुन्हेगारांना शिक्षेनंतर 7 दिवसांच्या आत फाशी देण्यात यावी, अशी विनंती केंद्राने केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टाकडे केलेल्या या मागणीत म्हणटले आहे की, सक्षम कोर्टाने डेथ वॉरंट जारी केल्यानंतर 7 दिवसाच्या आत याचिका दाखल करण्याचे आरोपीला बंधन असावे. गुन्हेगाराची दया याचिका फेटाळल्यानंतर 7 दिवसांच्या आत डेथ वॉरंट जारी करण्याचे निर्देश सर्व कोर्ट, राज्य सरकारे, तुरुंग प्रशासनांना द्यावेत. डेथ वॉरंटनंतर सात दिवसात आरोपीला फाशी द्यावी. दोषींच्या सहकारी आरोपींची पुनर्विलोकन, क्युरेटिव्ह आणि दया याचिका कोणत्याही टप्प्यावर असली तरी ज्याच्याविरोधात डेथ वॉरंट असेल त्यास सात दिवसात फाशी देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्याची विनंती गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टाला केली आहे.
दिल्लीच्या एका हायकोर्टाने निर्भयाचे मारेकरी विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, मुकेशकुमार सिंह आणि पवनच्या विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. या चारही आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. त्यांना 22 जानेवारी रोजी फाशी होणार होती. परंतु, याचिका प्रलंबित राहिल्याने त्यांना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने 20 जानेवारी रोजी निर्भया प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली होती. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा एका आरोपीने करून दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर नवीन याचिका दाखल करून प्रकरण प्रलंबित ठेवता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते.
Visit : bahujannama.com