जालना : बहुजननामा ऑनलाईन- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. केंद्र सरकार हे दारुड्याचं सरकार आहे. केंद्र सरकार आता RBI च्या पैशावर डल्ला मारत आहे अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. जालन्यात आयोजित बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “केंद्र सरकार हे दारुड्याचं सरकार आहे. स्वत:चे पैसे संपल्यावर दारुडा जशी पैशांची चोरी करतो तसंच केंद्र सरकारही RBIच्या पैशांवर डल्ला मारत आहे. हम करे सो कायदा आणि विरोधात बोललं तर देशद्रोह अशी लेबलं लावली जात आहेत. सरकार हे झिंगलेल्या माणसासारखं चालत आहे. RSS आम्हला देशभक्ती शिकवतेय हे दुर्भाग्य आहे.” अशी टीकाही आंबेडकरांनी केली.
नुकतंच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या समाज प्रबोधन मेळाव्यात बोलत असताना त्यांनी येत्या विधानसभेत 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दाखवलेले धाडस आता दाखवले पाहिजे. समाजाने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. त्यामुळे माणूस गुलाम होतो. एमआयएम आणि आमच्यातील युती जरी संपुष्टात आली असली तरी येत्या विधानसभेत आम्ही 25 मुस्लिमांना उमेदवारी देणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचितांना मते दिली नव्हती. वंचितची मते मात्र एमआयएमच्या उमेदवाराला पडली होती.”