बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : 2021-20 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये विविध बाबींच्या दृष्टीने तरतूदी करण्यात आल्या. पण विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. हा अर्थसंकल्प ‘व्हिजनलेस’ आहे. तर हा बजेट आहे की OLX, असे टीकास्त्रही सोडले.
केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावरून सीपीएम नेत्याने टीकास्त्र सोडले. रेल्वे, विमानतळ, पीएसयू हे सर्व विकले आहेत. तसेच डावे नेते मोहम्मद सलीम अली यांनी सांगितले, की या अर्थसंकल्पात रेल्वे, बँक, विमा, सुरक्षा आणि स्टील सर्व काही सरकारकडून विकले जात आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX.
100 टक्के ‘व्हिजनलेस’ अर्थसंकल्प
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनीही या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले, की भारताचा हा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प असून, 100 टक्के व्हिजनलेस अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू भारताला विकणे हा आहे. रेल्वे विकली, विमानतळ विकण्याची तयारी केली जात आहे. पोर्ट विकले जात आहेत. विमा क्षेत्र विकले जात आहे. 23 पीएसयू विकला जात आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांकडेही दुर्लक्ष केले. श्रीमंत श्रीमंत होत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी काही नाही. गरीब आणखीन गरीब होत आहे, असेही ते म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून कौतुक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अर्थसंकल्पाला कल्याणकारी म्हणून संबोधलं आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्ग, गरीब, महिलांसह प्रत्येक घटकाची काळजी घेण्यात आली, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही स्तुती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. ते म्हणाले, केंद्र सरकारने नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाचा स्वीकार केला. भारत सरकारने नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची घोषणा केली. नागपूर मेट्रो 2 साठी 5976 कोटी रुपयांची घोषणा केली. या दोन्ही प्रकल्पाचे प्रस्ताव राज्यातील भाजप सरकारच्या काळात केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले होते.