बहुजननामा ऑनलाइन टीम – भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा ‘एअर इंडिया’चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. खासगीकराच्या घोषणेनंतर सभागृहात विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एअर इंडियावर जवळपास 60 हजार कोटींचे कर्ज असल्याने सरकारकडून कंपनीच्या विक्रीचा निर्णय होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती. अखेर त्यावर सोमवारी (दि. 1) शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामण यांचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
यावेळी सीतारामाण यांनी विविध क्षेत्रांतील तरतूदींची घोषणा केली. पण या सगळ्यात एअर इंडियाच्या विक्रीच्या घोषणेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सन 1932 मध्ये उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी स्थापन केलेल्या एअरलाईन्सचे सुरुवातीचे नाव टाटा एअरलाईन्स असे होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने टाटा एअरलाईन्सच राष्ट्रीयकरण केले. 1953 मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्स ताब्यात घेऊन तिचे नाव बदलले आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारने सुरु केल्या.
दरम्यान टाटा एअर इंडिया विकत घेणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. सिंगापूर एअरलाईन्स आणि टाटा यांची गुंतवणूक विस्तार या हवाई वाहतूक कंपनीत आहे. टाटा एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे समजताच सिंगापूर एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल काळजी व्यक्त केली.