निलंगा बहुजननामा ऑनलाईन – लातूर जिल्ह्यात होणारे बौद्ध आणि दलित समाजावर गावगुंडांकडून होणाऱ्या अन्यायांची मालिका सुरुच आहे. लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या माकणी (थोर) या गावात जातीवादी गावगुंडानी बौद्ध कुटुंबांना बहिष्कृत करत गावातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कुटुंबांनी पोलिसांचा धावा केल्यानंतरही पोलिसांकडून मात्र कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तर या गावगुडांच्या दहशतीमुळे बौद्धांना गाव सोडून जावे लागले आहे. त्यामुळे सरकार कोणाचेही असो दलित, वंचितांना न्याय मिळणे दुरापास्त झाले असल्याची स्थिती राज्यात आहे.
लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप शिवसेना युती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. माकणी (थोर) या गावात बौद्ध समाजाचे चार कुटुंब राहतात. ही कुटुंबं मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.परिस्थिती जेमतेम असलेली कुटंबं स्वाभिमानाने जगत असल्याने जातीय वाद्यांना हे बघवले नाही. त्यामुळे ते नेहमी या ना त्या कारणावरून बौद्ध समाजातील अंगद बसप्पा गवळी व इतरांना त्रास देत असतात.
२००१ सालापासून गावगुंडांकडून त्रास
२००१ सालापासून गावगुंडांकडून त्रास दिला जात आहे. २००१ साली काही जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात ठेऊन त्यांनी ९ जूलैपासून गवळी व इतर बौद्ध कुटुंबांना त्रास देण्यास सुरुवात केली.
काय घडलं ९ जूलै रोजी
अंगद गवळी यांनी सांगितले की, ९ जूलै २०१९ रोजी मी घरी नव्हतो. माझा मुलगा, मुलगी, सासू आणि इतर महिला होत्या. त्यावेळी मी घरात नसल्याचे पाहून गावातील जातीवादी गावगुंड यशवंत वामन सुर्यवंशी, वामन श्रीपती सुर्यवंशी, शांताबाई वामन सूर्यवंशी यांनी जातीय द्वेषातून आमच्या वस्तीत येऊन जातीवादी शिवीगाळ केली. अर्वाच्च भाषेत महिलांना अश्लील व वाईट पद्धतीने शिवीगाळ करून फुकटचे खाऊन तुम्ही माजलात. शेण काढून शेण खायची तुमची औलाद, आमच्या समोर इस्त्रीचे कपडे घालून ताठ मानेने फिरू लागलात.आता तुम्हाला तुमची औकात दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणत अपमानित केले.
पोलिसांची टाळाटाळ
घडलेला प्रकार मला माझ्या मुलाने सांगितला. तेव्हा मी समाजातील काही लोकांना घेऊन औराद पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा तेथे पोलिसांना सविस्तर हकीकत सांगून न्याय देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी गावाकडे येण्यास नकार देत एक अर्ज लिहून घेतला. तुम्ही जा आम्ही येतो म्हणत आम्हाला गावाकडे पाठवून दिले. त्यानंतर चार दिवस आम्ही पोलिसांची वाट पाहिली. परंतु पोलीस गावाकडे फिरकले नाहीत. याबाबत निलंगा विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे आम्ही तक्रारही केली आहे. परंतु अद्याप तरी काही कारवाई करण्यात आलेली नाही.
पुन्हा १२ जूलै रोजी महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ
१२ जूलै रोजी बौद्ध कुटुंबातील महिला गावात ये-जा करत असताना गावातील गावगुंडानी या महिलांना चौकात अडवून अश्लील अर्वाच्य भाषेत बोलून अपमानित केल. तुम्ही आमचं काहीच वाकडं करु शकणार नाही. असं म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा महिलांनी त्याला असं बोलू नका म्हटल्यानंतरही त्यांनी अश्लील भाषेत त्यावेळी महिलांनी याचा प्रतिकार केल्यावर गावातील इतर काही जण तेथे जमले. त्यांनी महिलांना शिवीगाळ केली. असं अंगद गवळी यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
गावातील लोकांनी बहिष्कृत केले
गावातील यशवंत वामन सुर्यवंशी ,शांताबाई वामन सुर्यवंशी, वामन श्रीपती सुर्यवंशी ,परमेश्वर प्रकाश सुर्यवंशी ,तुकाराम पांडुरंग सुर्यवंशी, हणमंत उर्फ पिंटू बाबुराव येळीकर, दिगंबर माणिक सुर्यवंशी ,प्रकाश उर्फ पिंटू हरिश्चंद्र सुर्यवंशी ,विजयकुमार व्यकंट सुर्यवंशी ,ओमकार बालाजी सुर्यवंशी ,मेघराज युवराज सुर्यवंशी, चंद्रसेनन वामन येळीकर ,मोहन पुंडलिकराव आकडे ,नेताजी शिवाजी सुर्यवंशी ,उल्लास मगरध्वज सुर्यवंशी, पवन मधुकर सुर्यवंशी ,कृष्णा बालाजी सुर्यवंशी ,व्यंकट नेताजी सुर्यवंशी व इतर 50 ते 60 लोकांनी १४ जुलै रोजी सकाळी ९ ते १० च्या सुमारास गावातील मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बौद्ध समाजाला गावात राहू द्यायचे नाही, बौद्ध लोकांना किराणा, राशन पाणी द्यायचे नाही. बौद्ध लोकांना गावात व इतर ठिकाणी फिरू द्यायचे नाही. इत्यादी जीवनावश्यक गोष्टी द्यायच्या नाहीत असा ठराव झाला. असे अंगद गवळी यांनी सांगितले.
ही बैठक झाल्यानंतर बैठकीतील सर्व लोक थेट बौद्ध वस्तीत घुसले व सर्वांनी तात्काळ आताच्या आता घरे सोडून चालते व्हा. अन्यथा बौद्ध वस्ती जाळून टाकू असा दमही दिला. त्यामुळे आम्ही घाबरून लहान मुलं बाळांसह वयोवृद्ध म्हाताऱ्या-कोताऱ्यांना घेऊन थेट गाव सोडून तालुक्याचे ठिकाण गाठले आहे. सध्या आम्ही तालुक्यातील समाज बांधवांकडे आश्रय घेत आहोत. असे गवळी यांनी सांगितले.
त्यानंतर पिडीत बौद्ध समाजातील कुटुंबांनी १७ जूलै रोजी औराद शहाजानी येथील पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यानंतरही अद्याप तरी कुठलीही कारवाई प्रशासनाने केलेली नाही.
न्याय मिळवून देण्याची मागणी पीडित अंगद बसाप्पा गवळी, तेजाबाई भीमराव ढाले, किरण अंगद गवळी ,विद्याबाई अंगद गवळी, आकाश अंगद गवळी, प्रभावती हंबिर गवळी,संतोष हंबिर गवळी,संतोषी संतोष गवळी,दीक्षा संतोष गवळी ,नागिन हंबिर गवळी, निलेश हंबिर गवळी ,सचिन शत्रुघ्न गवळी, हणमंत शत्रुघ्न गवळी,गीता हणमंत गवळी, लक्ष्मण भरत गवळी, वैशाली लक्ष्मण गवळी, दिव्या लक्ष्मण गवळी, प्रिती लक्ष्मण गवळी, अनिल भरत गवळी, वनश्री अनिल गवळी,अवधूत अनिल गवळी, गौतम लक्ष्मण गायकवाड़, नरसिंग रघुनाथ कांबळे, सुनीता नरसिंग कांबळे, वैष्णवी नरसिंग कांबळे, वैभवी नरसिंग कांबळे, नरेंद्र नरसिंग कांबळे यांनी केली आहे.