पुणे : बहुजननामा ऑनलाइन – देशाच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावणार्या आणि मीठ तयार करण्याचा पारंपारिक व्यवसाय जपणारा लोणारी समाज देशातील विविध राज्यात विविध नावाने ओळखला जातो. या समाजाची देशभरात दहा ते बारा कोटी लोकसंख्या असून अद्यापही हा समाज मागासलेला आहे. या समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपायोजना करण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन बिहारचे मंत्री मा. ब्रिजकिशोर बिंद यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणारी समाजाचे अध्यक्ष नगरसेवक रविंद्र धंगेकर, प्रमुख मार्गदर्शक प्राचिन लवणकार एवं व्यापारी जाती परिसंघाचे अध्यक्ष मुनिबसिंग चौहान, मुख्य महासचिव कृष्णकुमार भारती, माजी जि.प. सदस्य संभाजी होळकर, सातारा जि.प. चे माजी सभापती शिवाजी शिंदे, सिद्धार्थ गिते, बिजुअण्णा प्रधाने यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनासाठी देशभरातून लोणारी समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोणारी समाजाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष ऍड. कुमार काळेल आणि त्यांच्या सहकार्यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले होते.
प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी लोणारी समाजाची देशभरातील लोकसंख्या, त्यांचे इतिहासापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात असलेले योगदान याची माहिती देतानाच कोट्यवधीच्या संख्येने असलेला लोणारी समाज अद्याप मागासलेलाच असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लोणारी समाजाकडून केली जाणारी उत्पादकता, उत्पन्न आणि त्याबदल्यात लोणारी समाजाच्या उन्नतीसाठी मिळणारी शासकिय मदत यातील अंतरही आकडेवारीतून निदर्शनास आणून दिले. समाजाच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांना वसतीगृह, रोजगार निर्मितीसाठी आर्थिक विकास महामंडळ आदींची गरज असल्याची मागणी केली. यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील संघटनेने त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यासाठी पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. यासाठी तसे ठरावही या अधिवेशनामध्ये करण्यात आले.