पुणे : बहुजननामा ऑनलाईन – उदयनराजे भोसले यांनी कालच ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून संताप व्यक्त करत शिवसेनेवरही हल्ला चढवला. शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? सेनेचे नाव बदलून ठाकरेसेने करा, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.
आज पुण्यात झालेल्या लोकमत वृत्तपत्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी उदयनराजेंना उत्तर दिले आहे. “उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार असून भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका ते मांडत आहेत. मात्र एखादा महापुरुष हा सर्वांचा असतो. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कोणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाहीये. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असे आव्हानच त्यांनी केले.
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. छ.शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो. शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी दिली आहे. छ.शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेने त्यांना राजा मानले. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणार राजा होतो. शिवरायांवर कोणाचीही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे त्यावर कोणीही आक्षेप घ्यायची गरज नाही,” असेही संजय राऊत त्यावेळी म्हणाले.