पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात एका वृत्तपत्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी आणि राज्यातील इतर विषयांवर आपले मत व्यक्त केले. शरद पवार यांच्यावर माझी प्रचंड निष्ठा आणि विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणले आहेत.
शरद पवार यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितले की, आपण हे आपण करू शकतो. काही नवीन घडवू शकतो. हे सरकार बनवायचे, टिकवायचे तसेच चालवायचे असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणारच. शरद पवार हे ठाकरे सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असल्यामुळे त्यांच्यावर माझी निष्ठा आणि विश्वास आहे, असे राऊत म्हणाले.
तसेच “शरद पवार यांना मी मानतो. कारण त्यांनी अनेक वर्षे लोकांसाठी काम केले आहे. शरद पवार हे ‘जाणते राजे’ आहेत आणि राहणार. ही पदवी त्यांना लोकांनी दिली आहे,” असे म्हणत त्यांनी उदयनराजे यांना प्रत्युत्तर दिले. पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. रिमोट कंट्रोलद्वारे ते राज्य चालवत नाहीत. सरकारमध्ये जे चांगले आहे ते सांगतात आणि चुकीचं आहे त्याला विरोध करतात, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या कामाचेही कौतुक केले.