मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा विळखा अधीकच घट्ट होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाउन लागू केले आहे. दिवसभर जमावबंदी आणि रात्री संचारबंदी आणि आठवड्याच्या शेवटी पूर्णपणे लॉकडाउन असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून केंद्राने आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नाही असा महाराष्ट्राला एक सल्ला दिला असल्याची माहिती पुढं आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक झाली होती. त्यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना याबाबत सूचना केल्या असल्याचे समजते. तर आठवड्याच्या शेवटी २ दिवस असणाऱ्या लॉकडाउनची करोना रोखण्यास फार मदत होणार नाही. असे केंद्राने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्रही पाठवलं होतं. ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. “नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं होतं.
या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांना बोलण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लावण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या अभ्यासानंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असतानाही कोरोना नियमावलीचं पालन करण्यात लोक उदासीन दिसत आहेत. लोकांकडून सहकार्य केलं जात नाही, तसेच, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या ताणाबद्दल अंदाज लावण्यात आला. २ मुद्द्यांवर राज्यातील भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. यात बेड्सची संख्या आणि पुरेसा ऑक्सिजन. त्यात तज्ज्ञांनी असं सांगितलं की, ही रुग्णवाढ याच वेगाने होत राहिली, तर १७ एप्रिलपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल,असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आणि रविवारी झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी कोविड प्रभावित राज्यांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे केंद्राने ५० पथके तयार करून ती महाराष्ट्र राज्य , छत्तीसगढ आणि पंजाब राज्यात पाठवण्यात आलेली आहेत.