मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू झाला आहे. ठाकरे सरकारमधील नेते आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळे जण रुग्णालयात कसे? म्हणजे जी व्यक्ती कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रूग्णांना कसे सांभाळणार? हे अपयश आहे. कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता, असा सवाल राणे यांनी यावेळी केला.
नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरूनही ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही. जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे, त्यांना बर करणे ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग कोरोना होईल कसा, असे सवाल राणे यांनी केले आहेत.