मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर रात्री लगेच त्यांची भूमिका बदलली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना ? अशी शंका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोलिस दलातील एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता पडताळून पहावी आणि तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
देशमुखांना निर्दोष ठरवण्याची घाई करु नये
शरद पवार यांनी खुलासा करताना म्हटले होते की, अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान क्वारंटाईन होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा खुलासा खोटा असल्याचे दाखवून दिले. आता तरी राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांना निर्दोष ठरवण्याची घाई करु नये, असे सुधिर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
बार चालकांनी खंडन केले नाही
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करताना बार व पब चालकांकडून वसुली करण्यास सांगितल्याचे म्हटले होते. परमबीर सिंह यांनी पत्रात केलेल्या आरोपांचे कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने किंवा बार पब चालकांनी आरोपांचे खंडन केलेले नाही. याकडे देखील त्यांनी लक्ष वेधेलं.
सर्व आरोपांची चौकशी व्हावी
पोलीस महासंचालक दर्जाच्या एका अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप करणे हे अत्यंत गंभीर आहे. पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंडळींना या संदर्भात माहिती दिली होती. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसत नाही. एवढेच नाही परमबीर सिंह यांनी एवढे गंभीर आरोप केल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांनी यावर खुलासा करण्याची तसदीदेखील घेतली नाही. गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.