बहुजननामा ऑनलाइन टीम – ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकाने उघण्याबाबत काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवरुन भाजपाने त्यांच्यावर महापालिका कोणाची जहागिरी नाही असे म्हणत निशाणा साधला आहे. तसेच एकीकडे कोरोना संसर्ग महामारीच्या काळात राजकारण नको म्हणायचे आणि श्रेय वादासाठी आटापिटा करत विरोधकांना डावलायचे अशी शिंदे यांची भूमिका दुट्टपी असल्याची टिका भाजपाचे जेष्ठ आमदार संजय केळकवर व निरंजन डावखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी भाजपाचे आमदार व प्रतिनिधींना सांगण्यात आले नाही. तर शिवसेनेकडून दुकाने उघण्याबाबत निर्णय घेतल्याचे श्रेय घेतले जात असल्याचा आरोप केळकर व डावखरे यांनी केला. मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. पण ठाण्यातील दुकानांवर निर्बध लागू होते. याबाबदल भाजपाने व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती पाहून आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदन दिले.
तेव्हा शिवसेना गप्प होती. पण काल झालेल्या बैठकीनंतर दुकाने उडण्याचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. कोरोनाच्या काळात राजकारण नको, म्हणत विरोधकांना विश्वासात न घेताच परस्पर बैठक घेण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत, असे भाजपाने सांगितले. तसेच ठाण्यातील रुग्णसंख्या कमी होत असून, आमच्याच मार्गदर्शनामुळे व नेतृत्वाखाली कोरोना आटोक्यात आल्याचे दाखवण्यास प्रयत्न सुरु झाल्यास ठाणेकरांना आश्चर्य वाटणार नाही, असा टोला सुद्धा केळकर व डावखरे यांनी लगावला.