ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न गृहमंत्री देशमुखांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ घरी पाठवावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याप्रकरणी मनसुख हिरेन यांना अडकवण्याचा वाझेंचा डाव होता. सर्व प्रकरणाच्या मागे हिरेन असल्याचे पोलिसांना भासवायचे होते. मात्र, हिरेन यांनी ते मान्य केले नाही. त्यामुळेच त्यांची हत्या झाली. त्यानंतर पोलीस सर्व पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 2004 मध्ये वाझेंची हकालपट्टी केली होती. 2007 मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्ही वेळेस राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता. तरीही त्यांना सेवेत घेऊन चांगली पोस्टींग दिली. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. शरद पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा या प्रकरणावर भाष्य करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांच भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.