मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पण तरी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातील विचारसरणीचा लढा सुरूच राहील. उलट, त्या लढ्याचा जोश दहापटीने वाढेल, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. एका खटल्यासाठी ते न्यायालयात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
देशातील कष्टकरी , शेतकरी ,गरीब,आणि कामगारांबरोबर आपण उभे असून मागील पाच वर्षांत आपण जो लढा दिला; त्याची तीव्रता दसपटीने वाढेल. माझयावर आक्रमण होत आहे आणि मला मजाही येत आहे, असेही ते म्हणाले. मला जे काही म्हणायचे होते ते राजीनामापत्रात नमूूद केले आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत बुधवारी चारपानी राजीनामापत्र जारी केले. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान,न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणाऱ्या घोषणा देत फलकही झळकवले होते. राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते व्यथित झाल्याची प्रचिती न्यायालयाबाहेर आली.