जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – कालच एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे विधानसभेचे तिकीट कापले गेल्याचा आरोप केला होता. परंतु त्यांच्यात आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सगळं काही ठीक असून फडणवीस आणि महाजन यांच्यावर कोणतेही आरोप केला नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. शुक्रवार (३ जानेवारी) रोजी त्यांनी फडणवीस यांची जैन इरिगेशन गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. भेटीदरम्यान गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते.
खडसे, फडणवीस आणि महाजन यांची अर्धा तास चर्चा चालली. चर्चेत खडसे यांनी आपल्या नाराजीबद्दल काहीही वक्तव्य केलेले नाही. आपल्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली असून चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावे पाठवली होती. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले त्यानुसार आमची चर्चा झाली आहे. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही’, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
खडसे यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस काहीतरी स्पष्टीकरण देतील असे वाटत होते. परंतु फडणवीस यांनी बोलणे टाळून तेथून धडगावकडे निघाले. अर्ध्या तासाच्या भेटीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे खडसे व महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी आपल्या नाराजीबद्दल काहीही वक्तव्य न केल्याने ते अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे.
Visit : bahujannama.com