मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – “मला वाटतं की शिवसेनेची परिस्थिती चित हो गयी, तो भी मेरी टांग उपर अशी झाली आहे. अनेक जणांचे डिपॉझिट वाचले नाही, नोटापेक्षा कमी मते मिळली, त्यांनी आत्मचिंतन करावे. भाजप मोठा पक्ष आहे, केवळ बिहारमध्ये नाही, तर देशातील पोटनिवडणुकांमध्ये जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला,” असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टाळेबंदी काळात जेव्हा लोक ग्रासलेले तेव्हा अनेक मंत्री, मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत होते. त्या टीकेची पर्वा न करता नरेंद्र मोदी काम करत होते, जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला, त्यामुळे या टीकाकारांनी आता आत्मचिंतन करावे, नरेंद्र मोदी कसे काम करतात ते पाहावे,” असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला.
कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही
“शरद पवार मोठे नेते आहेत, मी लहान नेता आहे. पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली. कोरोनामुळे काही काळ लढलो नाही, मात्र मी आनंदी असून, कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसला सध्या कोण विचारत नसून, वेगवगेळ्या राज्यांतील असलेल्या काँग्रेसच्या युतीमुळे त्यांच्याकडे मतदार उरला नाही. राजकारणात जर, तर या शब्दाला अर्थ नसतो, बिहार निकालाचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिले पाहिजे,” असे फडणवीस यांनी सांगितलं.
बिहारमध्ये महिलांनी भाजपला जास्त मते दिली
“बिहारमध्ये १५ वर्षे सरकार होते, त्याचा थोडा परिणाम झाला. मात्र, मोदींबाबत लोकांना विश्वास आहे. पुरानंतर बिहारी लोकांना मदत केली. आपत्ती कालखंडात लोकांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे राहिले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. काँग्रेस आरजेडीच्या सभेत आलेल्या महिलांनीसुद्धा नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला, ६ टक्के महिलांचे मतदान वाढले. हा फरक निकालात दिसून आला,” असेदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.