नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारात सत्ताविरोधी लाट आणि विरोधकांचे कडवे आव्हान पार करत एनडीएने बहुमताचा आकडा मिळवला आहे, ज्यानंतर नितीश कुमार यांचे सीएम बनण्याचे स्वप्न पुन्हा एकदा साकार होत आहे. नितीश सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, पण यावेळी त्यांच्यासाठी सर्वकाही पहिल्यासारखे सोपे असणार नाही. यावेळी राजकारणाचे समीकरण आणि स्थिती दोन्हीही वेगळे आहे, ज्यामुळे नितीश यांच्या समोरची आव्हानेसुद्धा अनेक आहेत. एकीकडे त्यांना मजबूत विरोधी पक्षाचा सामना करावा लागेल, तर दुसरीकडे आपल्या चार सहकार्यांसोबत संतुलन साधावे लागणार आहे.
1. सहकारी पक्षांच्या सोबत संतुलन
नितीश कुमार अजूनपर्यंत बिहारमध्ये आपला एकमेव सहकारी भाजपसोबत सरकार चालवत होते. परंतु यावेळी एनडीएमध्ये चार सहकारी आहेत. यावेळी भाजपसह जीतन राम मांझी यांचा हम आणि मुकेश सहानी यांचा व्हीआयपीसुद्धा आघाडीत भागीदार आहे. हे दोन्ही पक्ष आघाडीचे भाग आहेत. शिवाय सरकार चालवण्यासाठी आवश्यक बहुमताच्या आकड्यातीलसुद्धा ते भागीदार आहेत. एनडीएला असा जनादेश मिळाला आहे, ज्यामध्ये नितीश कुमारांच्या खुर्चीच्या चार पायांचे चार मालक आहेत.
म्हणजेच, एनडीएमध्ये कुणा एका सहकारी पक्षाचे नाराज होणे किंवा इकडे-तिकडे होणे याचा अर्थ हा आहे की, सरकारसाठी आवश्यक बहुमताच्या आकड्यापासून दूर होणे. उघड आहे की, अशा स्थितीत सर्वांच्या आपल्या अटी असतील आणि सर्वांचा आपापला दृष्टिकोन असेल. नितीश यांच्या मंत्रिमंळाच्या निर्णयाबाबत दबाव स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नितीश कुमार यांच्या समोर सर्वांत मोठे आव्हान आपल्या चारही सहकारी पक्षांसोबत संतुलन आणि सामंजस्य ठेवून वाटचाल करण्याचे असेल.
2. सरकारवर नियंत्रण कसे ठेवणार
नितीश कुमार पूर्ण मजबुती आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय काम करणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. विरोधक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर कुणाशीही विचारविनिमय न करता निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून टीका करत आले आहेत. बिहारमध्ये समीकरण आहे की नितीश यांच्यासाठी सरकार चालवणे आणि खुलेपणाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पहिल्यासारखे नसेल. नितीश कुमार यांना आपल्या नियंत्रणात ठेवून शासन करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
3. मंत्रिमंडळात जेडीयू अल्पमतात राहील
नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूची सरकारमधील भागीदारी कमी असेल. एनडीएमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. जीतनराम मांझी आणि मुकेश सहनी यांच्या पक्षांनासुद्धा महत्त्व आले आहे. विधानसभेत ज्याची जेवढी भागीदारी, त्याची कॅबिनेटमध्ये तेवढी भागीदारी, या फार्म्युल्यावर बिहारमध्ये कॅबिनेटची भागीदारी मिळत आली आहे. अशाप्रकारे नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचे मंत्री जास्त असतील तर जेडीयू मागच्यावेळेपेक्षा कमी असतील. बिहारमध्ये जास्तीत जास्त 36 मंत्री बनू शकतात. अशाप्रकारे जेडीयू मंत्रिमंडळात अल्पमतात राहील.
4. मजबूत विरोधकांचा सामना करावा लागेल
बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांना प्रथमच मजबूत विरोधकांचा सामना करावा लागेल. 2005 मध्ये पहिल्यांदा ते पूर्णकाळ सीएम होते, तेव्हापासून विरोधक बिहारमध्ये कमजोर स्थितीत होते. यावेळी विरोधकांनी पहिल्यांदा त्यांना घेरण्यासाठी किमान 115 आमदार असतील. विरोधक ना केवळ संख्या बळाने जास्त आहेत, तर तेजस्वी यादव या निवडणुकीत एक मजबूत नेते म्हणून समोर आले आहेत. अशा स्थितीत कुमार यांना सर्व सोपे असणार नाही. तसेच ओवेसी यांच्या पक्षाचेसुद्धा एक मोठे आव्हान असेल.
5. नितीश यांना आपली गमावलेली प्रतिमा मिळवण्याचे आव्हान
नितीश कुमार सत्तेत परतले असले तरी, निवडणुकीत ज्याप्रमाणे त्यांच्याविरोधात लोकांची नाराजी पाहायला मिळाली, त्यावरून नितीश कुमार यांच्या सुशासन प्रतिमेला तडा गेला आहे. ही प्रतिमा पुन्हा मिळवणे आणि मजबूत करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.