भागलपूर – घरातील भांडणाला कंटाळून बिहारमधील भागलपूर जिल्हातील एका मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. तसे पत्र त्याने राष्ट्रपतींना लिहले होते. हे पत्र राष्ट्रपतींनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवून दिले. पंतप्रधान कार्यालयाने या पत्राच दखल घेत त्वरीत जिल्हा प्रशासनाला चौकशी करण्याचे आदेश दिले.
कृष कुमार मित्रा असे पत्र लिहिणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाचे नाव आहे. भागपूर जिल्ह्यातील कहलगाव ठाणे अंतर्गत असणाऱ्या महिषामुंडा गावातील तो रहिवाशी आहे. तो नववीच्या वर्गात शिकत आहे.
कृष मित्राने पत्रात लिहिले आहे की, माझा आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. वडील मनोज आणि आई सुजाता यांच्यात अनेक वर्षापासून वादविवाद सुरु आहेत. मनोज हे कॅन्सर पीडित आहेत. ते सध्या ग्रामीण विकास विभागात जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर सुजाता इंडियन ओवरसीज बँक पटणा येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या भांडणामुळे हे दोघंही वेगळे राहतात. तो वडीलांसोबत राहतो आहे.
आईच्या त्रासाला कंटाळून आपल्याला इच्छामरणाची परवनागी द्यावी असे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देखील कृषने लिहले आहे. या प्रकरणी आता प्रशासन नेमकी काय भुमिका घेते आहे,याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.