नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आगामी विधानसभेत नुकसान टाळण्यासाठी काँग्रेसने डिझास्टर मॅनेजमेंटला सुरुवात केली आहे. राज्यातील 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा लढवण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत एक खास योजना तयार केली जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जे नेते कधीही विधानसभा लढले नाहीत त्यांनाही आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. परंतु काँग्रेसचा हा आदेश हे नेते पाळतील का असा खरा प्रश्न आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विधानसभेत फार काही हाती पडणारी नाही याचा अंदाज आल्याने करो या मरो ने किती नेते लढतील अशीही शंका व्यक्त होताना दिसत आहे.
राहुल गांधींनींही अध्यक्ष पद सोडलं आहे त्यामुळे पक्षात एक पोकळी नर्माण झाली आहे. गेली पाच वर्ष सत्तेबाहेर असल्याने काँग्रेसचे अनेक आर्थिक स्त्रोत आटले आहेत. जे काही शिल्लक होते ते सत्ताधारी भाजपने बंद केले आहेत. त्यानंतर सोनिया गांधींकडे जरी अध्यक्ष पद आलं असलं तरी त्या मात्र पूर्वीसारख्या सक्रिय राहिलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला खूप वेळ लागत आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नाही. त्यामुळे अनेक नेते निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसच्या छाननी समितीची 18 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. 15 गुरुद्वारा रकाब गंज मार्गावरच्या वॉर रुममध्ये ही बैठक होणार आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 4 वाजता केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही होणार आहे.