बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घ्या. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. प्रशासनानेही आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
बारामती येथे आयोजित उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये अजित पवार यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. ते म्हणाले, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात गर्दी होणार नाही, यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढवावी. वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्यात आले होते. त्यादरम्यान दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा या पथकाने दिला आहे.
पुणे, मुंबईत वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या
पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे लसीकरण मोहीमही वेगाने सुरू आहे.