मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर 25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. एनआयएने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. वाझे यांच्यावर निलंबनाची झालेली ही दुसरी कारवाई आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठीत असून, एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना 11 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल्याने सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकरणावरून जुंपलेली असताना भाजपचे नेते आशिष शेलार टीआरपी (TRP) प्रकरणाच्या चौकशीची मागणी करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आशिष शेलार यांनी ट्विट करून टीआरपी प्रकरणातील सत्य समोर यायला हवे, अशी मागणी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘एन्काउंटर स्पेशल’ अधिकाऱ्याने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का ? त्याही प्रकरणात मीडिया हाऊसकडून वसुली केली होती का ? कुणाच्या जोरावर मीडिया हाऊसकडून वसुलीचे बळ आले ? कोण आहेत पडद्यामागचे सूत्रधार? सत्य समोर यायला हवे ! असे प्रश्न उपस्थित करून शेलार यांनी टीआरपी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ट्विटद्वारे केली आहे.