नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात महाविकसआघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्याने या नव्या सरकारकडून अनेक मागण्या जोर धरू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आरे, नाणार वरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आता सनातन संस्थेबाबतही सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली आहे. सनातन संस्था दहशतवाद पसरविण्याचं काम करत आहे. मालेगाव दंगलीत सर्व पुरावे असताना देखील भाजपने प्रज्ञा ठाकूरला खासदार केले, ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद पसरविणारा कोणत्याही समाजाचा असो त्याला शिक्षा हि व्हायलाच हवी, असे स्पष्ट मत व्यक्त करत हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारकडे त्यासंबंधी कारवाई करण्याची केली आहे.
याबाबत हुसेन दलवाई म्हणाले की, नाणार, ‘सरकारने आरे आंदोलकांबाबत घेतलेल्या निर्णयाने आनंद झाला. भीमा-कोरेगाव प्रकरणात निर्णय घेण्याचे काम सुरु आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या दोघांमुळेच दंगली घडल्या. सांगलीच्या दंगलीवेळी जंयत पाटील यांनी भिडेंची बाजू घेतली होती. त्यामुळे मी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेऊ नये असं सांगणार आहे. भिडे-एकबोटे यांचा सहभाग असल्याने यांना अद्दल घडविली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच शिवसेनेने सनातन धर्म संस्थेला कधी पाठिंबा दिला नाही. राज्यात शांतता ठेवण्यासाठी या लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. काँग्रेस काळात हे झाले नाही, ती आमची चूक होती. मात्र आता महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेले असून आता याबाबत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात, त्यामागील सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे. सरकार नक्की या संबंधात विचार करतील असा विश्वासदेखील काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती देत आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावरही उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका बजावली. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
Visit : bahujannama.com