बहुजननामा ऑनलाईन टीम : अयोध्या खटल्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. या निकालाचं गांभीर्य लक्षात घेता खबरदारी म्हणून पुण्यातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर सकाळच्या सत्रातील शाळा केवळ सकाळी १० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मिरातील शाळांना याआधीच सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या सुचनेनुसार सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सकाळच्या सत्रात भरण्यात आलेल्या शाळा १० वाजता सोडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत न येण्यासंदर्भात मेसेज देण्यात आला असून, जर काही विद्यार्थी नियोजित वेळेत शाळेत आले तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पाठविण्यात यावे अश्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
अयोध्या खटल्यावर आज सकाळी दहा वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचनाला सुरुवात होणार असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे पाच सदस्यीय खंडपीठ या निकालाचे वाचन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सुप्रीम कोर्ट जो कोणता निकाल देईल तो निर्णय मान्य करण्याचे आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, अयोध्या निकालाच्या गांभीर्यामुळे उत्तर प्रदेशातील सुरक्षाव्यवस्थेत सर्वतोपरी खबरदारी आहे.अलिगड येथील इंटरनेट सुविधा खबरदारीसाठी खंडीत करण्यात आली आहे. तर कोणत्याही प्रकारचे धार्मिक तेढ पसरवणारे मेसेज पोस्ट करण्यापासून देशभरात बंदी घालण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com