बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकून देतात. त्यांच्या दंगा प्रमुखा सोबत भाजपचे ब्लॉक प्रमुख लढतील आणि जिंकतीलही असं शाह म्हणाले आहेत. कूचबिहारमध्ये रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला मतदान करण्यांच आवाहन जनतेला केलं.
अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगालमध्ये जय श्री राम म्हणायचं नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का. निवडणूक संपता संपता ममता बॅनर्जीदेखील जय श्री राम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाीच मतं घेण्यासाठी असं करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल.
पुढं बोलताना शाह म्हणाले, यावेळी भाजपचं सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढंच नाही तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.
शाह म्हणाले, येथील विकासासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं काही केलं नाही. भाजप सरकार मोदींचं सूत्र सबका साथ-सबका विकास या मार्गानं चालत आहे. आम्ही सर्व समाजांची संस्कृती, भाषा, संगीत आणि साहित्य पुढं घेऊन जाणारे लोक आहोत. त्यामुळंच संपूर्ण देश हळू हळू मोदींच्या नेतृत्वात भाजपशी जोडला जात आहे. यावेळी ममता दीदी, ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण बंगालच्या जनतेनं परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे असंही ते म्हणाले.