औरंगाबाद बहुजननामा : एकीकडे पावसाच्या पाण्याने काही ठिकाणी थैमान घातले असून काही परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. अश्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उपयुक्त ढग असल्याने मंगळवारी विमानाने आकाशात झेप घेतली. महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना तसेच घनसावंगी तालुक्यांमधील काही गावांमध्ये सहा फ्लेअर्स सोडण्यात आल्या. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस झाला आहे.
फ्लेअर्स संदर्भात अद्यापही परवानग्या प्रलंबित असल्यामुळे कृत्रिम पावसाच्या विमानाने सोलापूर येथून उड्डाण घेतले. दरम्यानच्या वैमानिकाला डॉप्लर रडारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तसेच इतर तालुक्यातील काही गावांवर पाऊस पाडण्यायोग्य उपयुक्त ढग असल्याची माहिती देण्यात आली.
यानंतर बेलगाव, हासनखेडा व भटाण सह सहा ते आठ गावांवर सहा फ्लेअर्स सोडण्यात आले. ढगांवर रसायनांची फवारणी केल्यानंतर काही गावांमध्ये पाऊस पडला आहे. नेमका किती पाऊस पडला या संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. आज घेण्यात येणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीतून उद्या विमान उडणार कि नाही हे ढगांच्या स्थितीनुसार ठरविता येणार आहे.