बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami was arrested) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिकने केला आहे. यावरून आता भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Maharashtra BJP chief Chandrakant Patil) यांनी भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडल्याचे या कारवाईबद्दल म्हटले आहे. तसेच त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलन, उपोषण, मोर्चा, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.
पाटील यांनी ट्विटद्वारे या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की देशातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही. म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्याप्रकरणी जी केस 2018 सालीच बंद झाली होती, ती केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडून त्यांना अटक केली आहे. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि एक भारतीय नागरिक म्हणून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे, की हे राज्यात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात. पण, महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटल आहे. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार असे पाटील यांनी ट्विटद्वारे म्हणाले आहेत.